माझ्या पाठीमागे कोणतीही गाडी नको, पोलीस सायरनही वाजवू नका’; कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे प्रशासनाला आणि कार्यकर्त्यांना थेट आवाहन.
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या व्ही.आय.पी. संस्कृतीला पूर्णपणे फाटा देत एक नवा आदर्श समोर ठेवला आहे.
बारामती / इंदापूर:
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रशासनाला एक अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील आवाहन केले आहे. "मी जेव्हा भागात दौऱ्यावर किंवा प्रवासात असतो, तेव्हा माझ्या पाठीमागे वाहनांचा मोठा ताफा किंवा कोणतीही अतिरिक्त गाडी ठेवू नका. अगदी पोलीस बंदोबस्ताची गाडी सोबत असली, तरीही त्यांनी पोलीस सायरन वाजवू नये," असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले आहेत.
नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान पाठीमागे गाड्यांची मोठी रांग असणे आणि सायरनचा मोठा आवाज असणे, हे सध्याच्या राजकीय संस्कृतीत सर्रास पाहायला मिळते. मात्र, कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या व्ही.आय.पी. संस्कृतीला पूर्णपणे फाटा देत एक नवा आदर्श समोर ठेवला आहे.
नेमके काय म्हणाले कृषिमंत्री?
प्रवासात किंवा दौऱ्यादरम्यान पाठीमागे गाड्यांचे ताफे असल्यामुळे विनाकारण इंधनाचा अपव्यय होतो. तसेच, पोलीस बंदोबस्ताच्या गाड्यांचे सायरन सतत वाजल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण तयार होते, शांतता भंग होते आणि वाहतुकीला नाहक त्रास सहन करावा लागतो. मला जनतेमध्ये राहून सर्वसामान्यांसारखे काम करायला आवडते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीमागे गाड्या लावू नयेत आणि प्रशासनानेही सायरन वाजवणे टाळावे."
सर्वसामान्यांकडून कौतुक
दत्तात्रय मामा भरणे यांनी घेतलेल्या या धाडसी आणि कौतुकास्पद निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. नेहमीच आपल्या साधेपणासाठी आणि जनसामान्यांत मिसळण्याच्या वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मामांनी व्ही.आय.पी. थाट नाकारल्यामुळे त्यांच्या "लोकनेता" या प्रतिमेला अधिकच उजाळा मिळाला आहे.
