बंद साखर कारखान्यांना नवं जीवन; 17 कारखाने सुरू, 55 लाख मेट्रिक टन ऊस गाळप – बोत्रे पाटील यांच्या कामगिरीचे समर्थन. संतोष वारगड
बोत्रे पाटील यांनी केवळ कारखाने सुरू केले नाहीत, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला नवी दिशा दिली आहे.
महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत होते. यापैकी बरेच कारखाने आमदार, खासदार व मंत्री घराण्यांशी संबंधित असल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत बोत्रे पाटील यांनी पुढाकार घेत तब्बल 17 बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू केले.
या कारखान्यांमध्ये आजपर्यंत सुमारे 55 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून हजारो कामगारांना रोजगार मिळाला आहे. तसेच ऊस तोडणी कामगारांनाही पुन्हा काम उपलब्ध झाले आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून कारखाने उभे करण्याची धाडसी भूमिका बोत्रे पाटील यांनी घेतल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, एका महिन्याचे ऊस बिल प्रलंबित असल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे बिल देणे आवश्यक असले तरी त्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वी कारखाने बंद असताना शेतकऱ्यांचा ऊस वाया जात होता व पैसे मिळत नव्हते, मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याचेही नमूद करण्यात आले.
— संतोष वारगड
प्रवक्ते, महाराष्ट्र सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य
