चिमुकलीस न्याय कधी? संतप्त समाजाची हाक, भावनिक आवाहनातून प्रश्नचिन्ह . सतीश(भाऊ)साबळे
आमच्या नेत्यांना आम्ही जाब विचारु शकत नाही... कारण ते विकासात बिझी आहेत. त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांशी काही देणं घेणं नाहीये...
महाराष्ट्र सोशल मीडिया :- चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण समाज हादरला आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील काही घटकांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत वेदनादायी आणि अंतर्मुख करणाऱ्या आहेत.
“आम्ही अजूनही गुन्हेगाराची जात, धर्म, पंथ शोधण्यात गुंतलो आहोत; पण खरे तर अशा नराधमांना कोणतीही जात-धर्म नसतो,” असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे. समाजातील संवेदनशीलता कमी होत चालल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
घटनेनंतर काही काळ सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले जाते, मोर्चे काढले जातात; मात्र नंतर सर्वजण पुन्हा आपल्या आयुष्यात गुंतून जातात, ही वस्तुस्थितीही समोर आली आहे. अशा गंभीर घटनांवर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
तसेच, शासन, महिला आयोग आणि संबंधित यंत्रणांनी अधिक सक्रिय होऊन अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
“अशा घटना आपल्या कुणाच्या वाट्याला येऊ नयेत, हीच प्रार्थना,” असे म्हणत एका आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या निष्पाप जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, समाजाने आता केवळ प्रतिक्रिया न देता बदल घडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
— सतीश भाऊ साबळे
अध्यक्ष, महाराष्ट्र सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य
