रत्नाकर मखरे यांच्या जाण्याने इंदापूर तालुका पुरोगामी विचाराला मुकला -- हर्षवर्धन पाटील
रत्नाकर मखरे गोरगरिबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते
रत्नाकर मखरे यांच्या जाण्याने इंदापूर तालूका पुरोगामी विचाराला मुकला... --हर्षवर्धन पाटील
इंदापूर : सुरेश मिसाळ
रत्नाकर मखरे गोरगरिबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते, त्यांच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला असून आंबेडकरवादी चळवळीचे खुप मोठे नुकसान झाले आहे,अशी भावना व्यक्त करीत माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांना श्रध्दांजली वाहिली.
इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मल्हारी मखरे यांचे शुक्रवारी (दि.14 मे) निधन झाले.आज भिमाई आश्रमशाळेच्या प्रांगणात त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम झाला.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तात्यांना श्रध्दांजली अर्पण केली. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, रत्नाकर मखरे यांनी आयुष्यभर उपेक्षित वर्गासाठी काम केले.मखरे परिवाराच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. कै.तात्या आणि माझे जवळचे संबंध होते. कर्मयोगी शंकररावजी पाटील ( भाऊ ), कै.शहाजीराव ( बापू) पाटील, या सर्वांशी त्यांची मैत्री होती.तात्या नगराध्यक्ष झाले. तात्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह भिमाई आश्रम शाळा स्थापन केली. त्यामुळे या परिसरातील गोरगरिबांना आधार मिळाला.तात्यांच्या जाण्याने गोरगरिबांचे अश्रू पुसणारे थोर समाजसेवक आपल्यातून गेले आहेत. आज तात्या जरी आपल्यामध्ये नसले तरी राहुल तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला मदत केली जाईल.आपण सर्व समाजासाठी काम करतो.राजकीय पक्ष, मतभिन्नता वेगळी असू शकते तो प्रत्येकाचा वैचारिक भाग आहे. मात्र ज्यावेळेस सामाजिक हित समोर ठेवून आपण एकत्र येतो तेव्हा तात्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरिता आपल्याबरोबर राहू, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. या वेळी इंदापूर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच यावेळी अनेकांनी रत्नाकर मखरे उर्फ तात्यांना श्रद्धांजली वाहिली.
