काठावर पास झालेले राज्यमंत्री भरणे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत... -- हर्षवर्धन पाटील
वीज तोडणीमुळे शेतक-यांवर मोठे आर्थिक संकट..
इंदापूर : विशेष प्रतिनिधी
सध्या शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. काठावरती पास झालेले राज्यमंत्री भरणे हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही,अशी टीका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
महाआघाडी सरकारने चालवलेली शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकार अपयश आहे, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली . कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली.तसेच माझ्या काळातील एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीज तोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चारा पिके, भाजीपाला पिके करपून चालली आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.